शेअर बाजार मराठीत||मराठी गुंतवणूकदार ||Share Market Investment
गेल्या वर्षी म्हणजे मार्च २०२० मध्ये कोरोंनाचा अध्याय सुरू झाला होता. त्याचा प्रभाव भारतात वाढत असल्याची जाणीव होताच त्याच्या प्रसाराला अटकाव घालण्यासाठी देशभरात एकाच वेळी #Lockdown केला गेला. देश थांबला आणि पर्यायाने आर्थिक चक्रही थांबलं. असं वाटत होतं की हे परत सुरू होतंच की नाही! आणि या सर्वचे परिणाम शेअर बाजारावर होणं साहजिकच होतं. पाहता पाहता बाजारात मोठी पडझड सुरू झाली आणि २३ मार्चला ‘Lower Circuit’ लावलं गेलं. चित्रपटात म्हणतात तसं ‘डर का माहौल’ होता. अनेक तज्ञ असा अंदाज वर्तवत होते की बाजार आता वर्षभर काही वाढणार नाही. बाजारात अजून पडझड होईल आणि अनेक कंपन्या अक्षरशः बंद पडतील. पुढील महिनाभर अशी भीती सर्वांनाच होती. पण घडलं उलट! त्यादिवशी बाजाराने जो नीचांक बघितला तो शेवटचाच. त्यानंतर कमी-जास्त करत बाजार वाढू लागला. तेंव्हा ज्यांनी धाडस करून शेअर्स खरेदी केले त्यांना फायदा होऊ लागला. देशभरात (किंबहुना जगभरात) Lockdown असल्याने सर्वजण घरीच बसून होते. अनेकांनी घरबसल्या Demat Account सुरू केले. चांगले चांगले शेअर्स स्वस्तात मिळत असल्याने अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी पैसे गुंतवले त्यांना अल्पावधीतच नफा मिळू लागला. मग थोडासा धीर आला आणि शेअर बाजारात खरेदीचं सत्र सुरू झालं. ज्यांना शेअर बाजार चांगला समजत होता त्यांनी पैसा ओतून नफा मिळवायला सुरुवात केलीच पण अनेक नवखेही यामध्ये आले. दरम्यानच्या काळात हर्षद मेहताने केलेल्या घोटाळ्यावर आधारित “Scam 92” नावाची वेब सिरिज आली आणि शेअर बाजारात गुंतवणूक करणार्यांची संख्या लाखोंने वाढली. या वर्षभरात नवीन डिमॅट अकाऊंट सुरू करणार्यांची संख्या कोटींच्या घरात गेली. एका बाजूला सामान्य माणूस यामध्ये गुंतवणूक करत होता तर दुसरीकडे FII’s म्हणजे परदेशी गुंतवणूकदारसुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात शून्यावर असलेले व्याज दर, बंद असलेले उद्योग पाहता सगळा पैसा Equity Market मध्ये आला. या सार्याचा परिपाक म्हणजे मार्च २०२० मध्ये ७५०० च्या नीचांकी स्तरावर असलेला Nifty साधारणपणे मार्च २०२१ येईपर्यंत १५३०० पर्यन्त येऊन पोचला. अनेक तज्ञांचे अंदाज चुकीचे ठरले. बाजाराने अभूतपूर्व परतावा मिळवून दिला.
/GettyImages-499170981-20e252a7742340ab9b03118f93e8d58c.jpg)
हा झाला एक वर्षाचा आढावा! जसा मार्च २०२० मध्ये शेअर बाजाराने Bottom बनवला होता तसा मार्च २०२१ मध्ये TOP बनवला आहे असं म्हणता येईल का.?
खरं तर बाजाराचा किंवा शेअरचा तळ आणि शिखर अगदी अचूकपणे कोणीही सांगू शकत नाही. तो बनून गेल्यावरच आपल्याला वास्तवाची जाणीव होते. फेब्रुवारी सिरिज अतिशय चांगली होती. केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर बाजारात अचानक उसळी पाहायला मिळाली होती. पण मार्च सिरिज ही भीती दाखवणारी ठरली. निफ्टि मध्ये साधारणपणे १००० अंशाची घसरण या सिरिजमध्ये पाहायला मिळाली तर Bank Nifty त्याहून अधिक कमकुवत होत ३६५०० पासून ३२५०० पर्यन्त घसरला आहे. या घसरणीमागे काही कारणे आहेत ते पाहूया!
- कोरोंना जणूकाही वर्षापूर्ती साजरी करण्यासाठी परत आला असावा याप्रमाणे जगभरात कोरोंनाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्याचे नवनवीन Variant किंवा स्टेन का काय म्हणतात ते दिसून येत आहेत. जगातील काही देशात पुन्हा Lockdown लावला आहे तर भारतातही काही शहरे बंद केली आहेत.
- दुसर्या बाजूला Bond Yield वाढत असल्याने Equity बाजारातून पैसा बाहेर पडताना दिसत आहे. अमेरिकेतील १० वर्षांची Bond Yield १४ महिन्यांच्या उच्चांकी १.७ वर पोचली आहे.
- वर्षभर तेजी करून बाजारही थकले आहेत आणि त्यामुळे नफावसूली होत असल्याची चिन्हे आहेत.
- अमेरिकेत नवीन सरकार स्थिरस्थावर होत असून तेलाच्या राजकारणाला नव्याने सुरुवात होईल अशी चिन्हे आहेत.
- भारतात आर्थिक वर्ष मार्चमध्ये समाप्त होतं.
अशी काही कारणे बाजारातील घसरणीला जबाबदार असल्याचं तज्ञ मानतात. पण अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर बाजार वाढण्यासाठी आणि पडण्यासाठी काही विशिष्ट कारणे लागतातच असं नाही. आधी बाजार आपली चाल दर्शवतो आणि मग कारणांचा शोध घेतला जातो. कारण कोरोंना दिवसेंदिवस वाढत असताना नोवेंबरच्या आसपासही बाजार तेजीत होता. आता तर लसीकरण वेगाने सुरू असल्याने कोरोंनाची भीती तितकीशी नाही आणि पुन्हा Lockdown शक्य नसल्याचीही कबुली दिली गेली आहे. त्यामुळे नेमकं काय कारण असेल याचा शोध घेण्यात अर्थ नाही. पाहायचंच असेल तर शेअरच्या किमती आणि त्यांचं भविष्य एवढंच पाहायचं आहे.
हजारएक अंशाच्या घसरणीने नव्याने आलेल्या गुंतवणूकदारांना घाम फुटला असेल किंवा त्यांना आपल्या पोर्टफोलियोची काळजी वाटत असेल. पण Correction, Consolidation आणि Bull Run ही शेअर बाजारातील एक सामान्य प्रक्रिया आहे. जगाची चिंता करण्याची काही गरज नाही. गरज आहे आपली आर्थिक शिस्त योग्य रीतीने पाळण्याची. आपण जे निश्चित केलं आहे त्यावर लक्ष केन्द्रित करणे सर्वात सोयिस्कर आणि फायद्याचे आहे. शेअर्स आज आपल्या खरेदी किमतीपेक्षा कमी होताना दिसत असतील तर अजिबात घाबरण्याचे कारण नाही. चांगले शेअर्स आज नाही तर उद्या परत वाढणारच आहेत हे निश्चित आहे. एक साधं उदाहरण द्यायचं झाल्यास कोविडपूर्वी वाहन क्षेत्र खूप अडचणीत होतं. त्यावेळी टाटा मोटर्स हा शेअर खूप कोसळला होता. कोरोंना वगैरे काही नसताना तो १०० रुपयांपर्यंत खाली कोसळला होता. अनेकांनी तो शेअर २०० रुपयाला खरेदी केला होता. वर्षभर त्यात कसलाही परतावा भेटला नाही. कोरोंनानंतर त्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आणि तो शेअर 350 पर्यन्त धावला. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की चांगले शेअर्स वेळ आली की पुन्हा वाढतातच. कुठलाही शेअर सदासर्वकाळ वाढतच जाईल असं होत नाही. हेच सूत्र सेक्टरला सुद्धा लागू होतं. आपण मात्र ठाम राहावं. चांगले शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करत रहावेत. त्यात एक शिस्त लक्षात ठेवायची की एकाच शेअरमध्ये सगळे पैसे लावण्यापेक्षा चांगल्या दर्जाचे विविध शेअर्स जमा करत राहणे. आपल्या आर्थिक नियोजनात बसतील तेवढेच पैसे गुंतवणे आणि विनाकारण कुठल्याही शेअरमध्ये अंधाधुंद खरेदी न करणे! या मार्गाचा अवलंब केला तर नफा निश्चित आहे.
आता काय होईल.?
अनेकांना भीती वाटत असते की बाजार पडला आहे आता काय होईल.? बाजार परत वाढेल का.? आधी सांगितल्याप्रमाणे बाजार कुठपर्यंत पडत जाईल हे सांगणं अशक्य असतं. पण तांत्रिक कल पाहता निफ्टि १४१५० च्या स्तरांवर आहे तोपर्यंत फार पडझड होईल असं वाटत नाही. अजून आठ दिवस कदाचित घसरण पाहायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा खरेदीला सुरुवात होईल असा अंदाज आहे. अल्पकाळची मंदी अन अनंतकाळची तेजी हे निश्चित आहे. सध्या बाजारात अस्थिरता आणि अनिश्चितता आहे. त्यात VIX पण पुन्हा 23 पर्यन्त आला आहे. बाजारात तेजी आणि मंदी करणार्यांची जोरदार लढत पाहायला मिळत आहे. निफ्टि 14800 च्या वर स्थिर झाल्यावरच नवीन मोठ्या तेजीच्या पोजिशन घ्याव्यात. बँकिंग सेक्टर सध्याच्या पडझडीत अग्रेसर आहे. पण अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेलं हे क्षेत्र आहे. ते जास्त काळ अशा अवस्थेत राहणार नाही. त्यामुळे चांगले बँकिंग शेअर्स खरेदी करायला हरकत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची इच्छा आहे त्यांसाठी ही मोठी संधी आहे. स्वस्त झालेले चांगले शेअर्स खरेदी करायला हरकत नाही. शिवाय, सरकारी शेअर्समध्ये डिविडेंड मिळतो त्यावरही लक्ष ठेवायला पाहिजे.
तेजी संपत नसते. ती पुन्हा येईल! आपल्यासमोर सध्या जे दिसत आहे ‘हीच ती वेळ!’ खरेदी करण्याची!
अभिषेक बुचके